ऊस बिले मिळवून देण्यात ‘स्वाभिमानी’ चे संघर्षमय योगदान
नागेवाडी 6 कोटी बिले 30 एप्रिलला तर तासगाव बिले चार दिवसात होणार जमा
9 कोटी रक्कम तासगाव तहसीलदार यांचेकडे होणार वर्ग
विटा : प्रतिनिधी
नागेवाडी कारखान्याची थकीत ऊस बिले 15 टक्के व्याजासहित सुमारे सहा कोटी रुपये सोमवार दिनांक 30 एप्रिल रोजी शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.तासगाव कारखान्याची ही बिले त्यानंतर चार दिवसात जमा होतील अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाचे यश आहे असा दावा करून महेश खराडे म्हणाले तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची थकीत ऊस बिले मिळावीत यासाठी गेल्या वर्षीच्या 16 एप्रिल पासून स्वाभिमानीच्या वतीने आंदोलन सुरू आहे. आता पर्यंत 35 कोटीची ऊस बिले शेतकऱ्यांना मिळवून दिली आहेत. यासाठी सात ते आठ आंदोलने करण्यात आली.अर्धनग्न आंदोलन, महिला मुंडण, भीक मांगो, बेमुदत ठिय्या, मोर्चे काढून सतत आंदोलनाची धग कायम ठेवली होती. त्यामुळे साखर आयुक्तांनी आर.आर.सी. ची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले होते. जिल्हाधिकारी सांगली यांनी ते आदेश तासगाव आणि विटा तहसीलदार यांना देवून साखर आणि मालमत्ता विक्रीची प्रक्रिया करण्यास सांगितले. तासगाव साखर लिलावास प्रतिसाद मिळाला नाही मात्र नागेवाडी कारखान्याच्या 49 हजार क्विंटल पोत्यांचा लिलाव 4 मार्च रोजी झाला.त्यातून 15 कोटी 70 लाख रुपये विटा तहसीलदार यांच्याकडे 24 एप्रिल रोजी जमा झाले.
पूर्ण रक्कम जमा होणे आणि राज्य शासनाच्या लेखा परीक्षण विभागाकडून शेतकऱ्याच्या याद्या अंतिम झाल्यानंतरच शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातात.त्यानुसार साखर लिलावाची पूर्ण रक्कम जमा झाली आहे.अंतिम याद्या 27 एप्रिल रोजी पूर्ण होवून तहसीलदार विटा यांना सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुरुवार व शुक्रवारी व खातरजमा व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून 30 एप्रिल रोजी नागेवाडी कारखान्याची राहिलेली ऊस बिले 15 टक्के व्याजसहित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.ती रक्कम वर्ग केल्यानंतर उर्वरित सुमारे 9 कोटी इतकी रक्कम तासगाव तहसीलदार यांच्याकडे वर्ग केली जाईल.राज्य शासनाच्या लेखा परीक्षण विभागाकडून शेतकऱ्याच्या नावाच्या याद्या अंतिम होवून आल्यानंतर चार दिवसात तासगाव कारखान्याची ऊस बिले शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केली जातील. एकंदरीत सदर बिले मिळणे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या वर्षभरात केलेल्या आंदोलनाचे यश आहे.
Published by SK NEWS MARATHI